कचरा मुक्त शहर हवे की कुंडया मुक्त : माजी नगरसेवक सोनवणे यांचा आयुक्तांना सवाल

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेतर्फे शहर कचरा कुंडी मुक्त करण्यासाठी सर्व कुंड्या उचलून शिवाजी उद्यान येथे सडण्यासाठी ठेवण्यात आल्या असून शहरातील कचरा मात्र जैसे थे असल्याचा आरोप करत कचरा मुक्त शहर हवे की कुंडया मुक्त असा प्रश्न माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केला आहे. लाखो रुपयांच्या कुंड्याची दुर्दशा थांबवा अशी मागणी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे श्री. सोनवणे यांनी व्हाट्स अप व मेलद्वारे केली आहे.

माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांच्या निवेदनाचा आशय असा की, महापालिकेचा पैसा हा फक्त ठेकेदाराला आणि त्याच्या सर्व टिमला देण्यासाठी नाही. हा पैसा सर्वसामान्य जनतेने कर रूपाने दिला आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वच्छतेची जबाबदारी सोपविली आहे. शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन टेंडर प्रक्रिया राबवाल. अनेक मोठ्या शहरात कचऱ्याचे नियोजन कसे हे अभ्यासण्यासाठी तेथे आपल्या अधिकारी वर्गाला पाठवा म्हणजे तेवढेच जळगावकराचे भले होईल. जळगावची कचरा फँक्टरी होती (घनकचरा प्रंकल्प) त्याचे काय झाले ते बघावे. कित्येक करोडो रूपये केंद्र सरकार पाठवते त्याचे चांगले नियोजन करून खरच कचरा मुक्त शहर बनू शकते. ज्या कचरा कुंड्या संडत आहे ते दुरूस्त करून अनेक ठिकाणी ठेवू शकता. तसे शक्य नसेल तर भंगारच्या भावात विकून पैसे तरी करून घ्या जेणे करून तेवढेच पैसे मनपाला कामात येतील. नाही तर त्या कचऱ्या कुंड्या पैकी ७५% गायब होतील आपल्या मनपाने शहरात किती कुंड्या बनविल्या होत्या आणी किती शिल्लक आहे याचाही ताळमेळ बसणार नाही. शहराची चांगली आणि योगपद्धतीने व माफक किंमतीत साफसफाई व्हावी अशी अपेक्षा माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content