कंडारी ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथे गेल्या आठवडाभरापासून पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात वारंवार पाणीपुरवठ्याची समस्या उद्‌भवत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज सकाळी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांचा निषेध केला.

कंडारी हे गाव तापी नदीकाठालगत वसलेले आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गावात नेहमीच पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते. जलशुध्दीकरण केंद्रातील वीज पंप वारंवार नादुरुस्त होत असल्याने पाणी पुरवठा खंडीत होतो. ही समस्या नेहमीचीच असून देखील अशा वेळेस ग्रामपंचायतीकडे अतिरीक्त वीज पंप देखील नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. नदीपात्रात पुरेशे पाणी असूनही गावात पाणी मिळत नसल्याने महिलांना नदीवर धुणे, भांडी करण्यासाठी जावे लागत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी विहीरीवरुन स्टॅण्डपोस्ट वरुन पाणी भरावे लागते. ही बाब नित्याची झाली असून, संतप्त महिलांनी आज सकाळीच ग्रामपंचायतीवर धडक देऊन पाणी पुरवठ्याची मागणी केली. तसेच गावात लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Protected Content