औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । . औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी. असे देखील पत्रात म्हटले आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर शिवसेना व काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवरून विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी कालच निशाणा साधला होता. “ही सर्व नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना व काँग्रेस ठरवून हे करत आहे. शिवसेनेने आता औरंगाबादचं संभाजीनगर करा असं म्हणायचं, म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. यावरून हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की, निवडणुका आल्यामुळे ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. दोन्ही पक्षांना याबाबत कुठलेही गांभीर्य नाही. मला असं वाटतं आहे की हे केवळ एक नाटक सुरू आहे.” असं फडणवीस पत्रकारपरिषदेत म्हणाले होते.

Protected Content