उजाड कुसुंबा गावात फक्त कागदोपत्री कामे- चौकशीची मागणी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उजाड कुसुंबा या गावात गेल्या काही वर्षांमध्ये विकासकामांसाठी ३ कोटी ८० लाखांचा निधी खर्च करण्यात आला असला तरी ही सर्व कामे कागदोपत्री करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज मनसेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

या संदर्भात मनसेच्या रस्ते व आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश निकम यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील उजाळ कुसुंबा या गावातील नागरिकांनी त्यांना शासनाचा कुठल्याही सुविधा चा आज पावेतो लाभ मिळालेला नसल्याने मागील एक वर्षापासून ते पाठपुरावा करीत आहेत परंतु त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने ते आमच्याकडे न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडे आले असून याबाबत हे निवेदन सादर करण्यात आले आहे.

यात पुढे म्हटले आहे की,आम्ही संबंधीत गावामध्ये भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी त्यांच्या समस्या बाबत चर्चा केली. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी मला सांगितले की गावामध्ये आजपर्यंत कुठेही पिण्याचे पाण्याची सुविधा नाही पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाबाहेर एक किलोमीटर दूर वरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. गावात सांडपाणी वाहण्यासाठी एकही गटार नाही. त्यामुळे पावसाळ्यात तर संपूर्ण गावामध्ये चिखलाचे साम्राज्य असते. आज पर्यंत गावात एकही रस्ता तयार झालेला नाही. तसेच गाव हे मुख्य हायवे पासून सुमारे चार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रात्री अपरात्री कोणी आजारी पडले तर त्यात दवाखान्यांमध्ये नेण्यासाठी पायी चालून जावे लागते. गावात एकही शौचालय नाही. त्यामुळे गावातील आई बहिणींना उघड्यावर शौचास बसावे लागते तसेच घरकुल योजने सुद्धा आजपर्यंत कोणाला मिळालेला नाही. अशी बिकट परिस्थिती असतांना सदरील गावासाठी सन २०१६ ते १७ यावर्षी रक्कम ४१,५०,०००/- सन २०१७ ते २०१८ या वर्षासाठी रुपये रक्कम १, ७८,००,०००/- २०१८ ते २०१९ या वर्षासाठी रुपये रक्कम ४५,००,०००/- २०१९ ते २०२० या वर्षासाठी रुपये रक्कम ५८,७०,०००/- २०२० ते २०२१ या वर्षासाठी रुपये रक्कम ५७,१०,०००/- असा एकुण ३,८०,३०,०००/- एवढा निधी मंजूर झालेला दाखवण्यात आलेला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, एवढा निधी मंजूर दाखविलेला असताना गावामध्ये आजपर्यंत पिण्याचे पाणी , शिक्षण, आरोग्य , रोड व रस्ते इत्यादी कामापैकी गावात एकही काम करण्यात आलेले नाही त्यामुळे संपूर्ण गाव हे विकासाच्या कितीतरी पटीने मागे आहे
तरी याबाबत संबंधित निधीचा कशाप्रकारे कोणीही गैरवापर केलेला आहे याची आपणाकडून लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी व यात दोषी असलेले अधिकारी कर्मचारी व सदरील निवडुन आलेले ग्रामपंचायत पॅनल तसेच ग्रामसेवक या सर्वांची चौकशी करण्यात येऊन यांच्यावर तात्काळ कडक योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.

दरम्यान,संबंधित गावांमध्ये वरील सुविधा चा येत्या १० ते १२ दिवसाच्या आत चालू करून मिळावा अन्यथा आम्ही आमच्या पक्षांतर्फे तसेच गावातील स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने लवकरच माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून असून पुढील होणार्‍या सर्व परिणामात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यात देण्यात आला आहे.

खालील व्हिडीओत पहा राजेश निकम यांनी या संदर्भात दिलेली माहिती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/376371647060362

Protected Content