नवी दिल्ली वृत्तसंस्था । स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. यावर युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘सावरकरांबद्दल संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक आहे. इतिहासावर किती दिवस बोलणार, आताच्या समस्यांविषयी बोलणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा, असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता दिला आहे.