नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आता आपल्याकडे ‘मौनेंद्र मोदी’ आहेत. ते माजी पंतप्रधान किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोणतीही माहिती देत नाहीत, अशा शब्दात कॉंग्रेसने लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावावरून टीका केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटवर म्हटलेय की, चीनने 1962 मध्ये भारतावर हल्ला केला. अटल बिहारी वाजपेयी आणि अन्य नेत्यांनी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. नेहरूंनी देखील त्यांच्या मागणीचा स्वीकार केला आणि त्यांच्यावर केलेल्या टीकाही त्यांनी ऐकल्या… आता आपल्याकडे ‘मौनेंद्र मोदी’ आहेत. ते माजी पंतप्रधान किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोणतीही माहिती देत नाहीत, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.