आघाडीचे प्रयोग आधीही फसले, आता काय होणार ? : फडणवीस

औरंगाबाद- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप विरोधी आघाडीचे प्रयोग आधीही फसले असून राव आणि ठाकरे यांच्या भेटीतून काहीही निघणार नसल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले.

देवेंद्र फडणवीस आज औरंगाबादच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही. पण एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन दुसर्‍या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं ही काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री मला भेटले होते. त्यामुळे मला यात काही फार महत्त्वाचे वाटत नाही. या सर्वांनी मागच्या लोकसभेत हातात हात घालून मोठी आघाडी केली होती. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उत्तर प्रदेशात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. देशातील विविध राज्यात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. कुठेही त्याचा परिणाम झाला नाही. खरे तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. पुढच्यावेळी तेलंगणात भाजपच नंबर वन असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, रोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झालं. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चाललं आहे सर्व लोक पाहत आहेत. गावोगावी काय चाललंय हे सर्व पाहत आहे. सुडाचं राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Protected Content