असामान्य कार्याबद्दल युवाशक्तीला प्रोत्साहन आवश्यक : डॉ. रामानंद

जळगाव प्रतिनिधी । सामान्यांमधील असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या युवा व्यक्तींचा सन्मान होणे व त्यांच्यावर शाबासकीची थाप मारणे हे महत्वाचे आहे. त्यांना मिळालेल्या या ऊर्जेमुळे सन्मानार्थी युवांना आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.

यशवंत फाउंडेशन संचलित चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोळा युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर कॅप्टन मोहन कुलकर्णी, रोटरी क्लबचे जितेंद्र ढाके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे, डॉ. ए.एन.चौधरी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती तळेले, लेखक मनोज गोविंदवार, क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते.

प्रस्तावनेत चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्याविषयी सांगत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ.कांचन नारखेडे यांच्यासह जितेंद्र ढाके, मनोज गोविंदवार, वैजयंती तळेले यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर युवा सन्मानाथींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते झाला.

डॉ. रामानंद पुढे म्हणाले की, व्यसनमुक्तीचे कार्य खूप महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात कार्य करताना सामाजिक बांधिलकी जोपासावी लागते. कोरोना काळात अगदी तुटपुंज्या पगारावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २४ तास अहोरात्र आरोग्य सेवा दिली आहे. ज्यावेळी रुग्णालयात येण्यासाठी लोकं घाबरायचे, ती भीती दूर करण्याचे महत्वाचे काम करण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेसह बेड साईड असिस्टंट यांनी सहकार्य केले. मास्क कधीच काढू नका. सामाजिक कार्यात तर मास्क कधीच काढू नका. तोच कोरोना थांबविण्यासाठी महत्वाचा उपाय आहे, असे सांगून डॉ. रामानंद यांनी स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली देशभक्ती व राष्ट्रप्रेमाची व्याख्या सांगितली.

सूत्रसंचालन राजेंद्र दौंड यांनी तर आभार अभिजित देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रतिक सोनार, दीपक पाटील, मेघराज बोरसे, संतोष किरंगे, भोला पाटील, मदन शिंगणे, मिलिंद नारखेडे, चंद्रशेखर शिंगणारे, आनंद विसपुते, घनश्याम चौधरी, विजय ठोके आदींनी परिश्रम घेतले.

असे आहेत सन्मानार्थी 
पत्रकार विश्वजीत दगडू चौधरी, धनश्री भागवत बागुल, सागर विजय दुबे, नाजनीन शेख रईस, साई मोरया ग्रुपचे उमाकांत राजेश जाधव, मंगेश पाटील, जिंदगी फाउंडेशनचे सुष्मिता भालेराव, कल्याणी कैलास जोशी, पार्थ चंद्रकांत यादव, कैलास दिलीप साळवे,नयन सखाराम मोरे, विनायक किशोर पाटील, केतकी जितेंद्र गोहिल, शीतल पाटील यांच्यासह निर फाउंडेशन व नवोदय निर्माण फाउंडेशन या संस्थांना मानपत्र, शाल, पुस्तक देऊन गौरवण्यात आले.

Protected Content