अनिल देशमुखांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मुकेश अंबानी स्फोटकं  आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे सरकारमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  टांगती तलवार आहे.

 

अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मोठे खुलासे होत आहेत.  गृहखातं बदनाम होत असल्याची भावना आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर हटवण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांनी आज दिल्लीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

 

शरद पवारांच्या भेटीत नेमकं काय झालं हे अनिल देशमुखांनी पत्रकारांना सांगितलं. देशमुख म्हणाले, ” आज मी सकाळी दिल्लीत आलो होतो. नागपुरातील मिहान प्रकल्प आहे. त्यामध्ये मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात येण्याचा विचार आहे. या इंडस्ट्री तिकडे आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांना साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांची माहिती घेतली. एनआयए आणि एटीएस सर्व तपास करत आहेत. त्यांना सर्व मदत राज्य शासनाची आहे. जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई राज्य शासन करेल.”

 

 

एकीकडे अनिल देशमुख मिहान प्रकल्पाबाबत जरी सांगत असले तरी, खुद्द शरद पवारांच्या भेटीसाठी ते दिल्लीत पोहोचले, यावरुन सध्याच्या राजकीय घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. सचिन वाझेप्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्यावरच टांगती तलवार आहे.

 

अनिल देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभारावर शरद पवार नाराज आहेत. अनिल देशमुखांचा खात्यावर वचक नाही, ते गृहखातं हाताळू शकत नाहीत, अशी भावना आहे. त्यामुळे शरद पवारांनी अनिल देशमुखांना दिल्लीत पाचारण केल्याचं सांगण्यात येत आहेत.

 

मुकेश अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर असलं तरी गृहखातं बदनामीच्या केंद्रस्थानी आहे. सचिन वाझे यांना शिवसेना वाचवत असल्याचा आरोप होत आहे. मात्र गृहखातं हे राष्ट्रवादीकडे असल्याने या खात्याकडेही बोट दाखवलं जात आहे.

 

सचिन वाझे यांचं नाव स्फोटक प्रकरणात आल्याने, गृहखात्यावर अनिल देशमुख यांचा वचक नसल्याची भावना शरद पवारांची आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. हे पहिलं कारण आहे, ज्यामुळे अनिल देशमुखांवर टांगती तलवार आहे. दुसरं म्हणजे मुंबई पोलीस, सचिन वाझे याप्रकरणात गृहखातं बदनाम झालं आहे. त्याशिवाय तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांचं मनोधैर्य खचल्याचं दिसत असल्याने, मुख्यमंत्रिपदानंतर सर्वात महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या खात्याचा कारभार, त्यांच्याकडे देणं योग्य नाही, त्यामुळे त्यांना हटवून गृहखात्याचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांच्या हे खातं सोपवलं जाऊ शकतं.

Protected Content