युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सम्मान

वाकोद प्रतिनिधी । कृषी क्षेत्रात आपल्या कार्याचा जागतिक पातळीवर ठसा उमटविला असे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे ऋषभदेव यांच्या असी, मसी आणि कृषी या तिघांचे मोठे अनुयायी होते. आज जैन परिवाराची गंगोत्री असलेल्या वाकोद नगरीत हा अभिनंदन समारोह महत्त्वाचा समजतो; असे विचार प.पू. महेंद्रऋषीजी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. वाकोद येथील हिराहस्ती समाज मंदिरात प्रज्ञामहर्षी युवाचार्य प.पु. महेंद्रऋषीजी महाराज यांचा ”दिव्यपद सम्मान”  समारोह 5 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सेवादास दलीचंदजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अशोक जैन, अमर जैन, प्रकाश समदडीया आदि मान्यवर उपस्थित होते. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सर्व सूचनांचे पालन करण्यात आले. उपस्थित सर्वांच्या डोक्यावर राजस्थानी पगडी, तोंडावर मास्क व गळ्यात जैन रंग प्रतीक असलेले वस्त्र होते.

प्रज्ञामहर्षि, आगमज्ञाता युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री. महेंद्रऋषीजी म. सा., उपप्रवर्तक परमपूज्य श्री. अक्षयऋषीजी म. सा. आदी ठाणा पाच यांचा जळगाववासियांना चातुर्मासाचा सहवास लाभला होता. चातुर्मास पश्चात जळगावहून विहार करून वाकोद येथे संत आदि ठाणा पाच विराजमान झाले. या औचित्याने जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघतर्फे युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांना ”श्रुतमहोदधी” पदवी देऊन मानपत्र प्रदान करण्यात आले. सेवादास दलीचंदजी जैन, रमेश जैन यांच्याहस्ते संतद्वयांना चादर ओढण्यात आली. कान्हदेशशिरोमणी-उपप्रवर्तक अक्षयऋषी यांना ही आदरची चादर ओढण्यात आली.

आरंभी अपूर्वा राका, मीनल समदडीया, ममता कांकरिया यांनी मंगलाचरण म्हटले. प.पू. अचलऋषी महाराज, प्रकाश समदडीया, प.पू. अमृतऋषी महाराज, महावीर गोलेछा, हितमीत भाषी प.पू. हितेंद्रऋषी म. सा. ताराबाई डाकलिया, ईश्वरलालजी साबद्रा, नागपूर श्री संघाचे सदस्य कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. जळगाव येथील श्राविका ताराबाई रेदासनी यांनी गीताच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच मिनल समदडिया यांनीदेखील भाष्य केले.

कान्हदेश शिरोमणी उपप्रवर्तक अक्षयऋषी महाराज यांनी उपस्थित श्रावक-श्रावकांशी सुसंवाद साधला. जळगांववासिय भाग्यवान आहेत की प.पू. युवाचार्य महेंद्रऋषिजी म.सा. यांचा चातुर्मास लाभला. कोरोना महामारीमुळे युवाचार्य म.सा. यांना मर्यादा आल्या होत्या परंतु पुन्हा एकदा युवाचार्यजी यांनी चातुर्मास करावा अशी कान्हदेशवासी यांच्यावतीने विनंती केली. खरे तर जळगावाचा मंगल प्रवेश जळगाव येथून आरंभ झाला आणि समारोप श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद तसेच जिल्ह्याचे शेवटचे गाव शेंदुर्णी येथे झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सेवादास व जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य दलीचंद जैन यांनी देखील मनोगत व्यक्त केले. द्रव्य, क्षेत्र, कल, भाव या नुसार आपापल्या पद्धतीने सर्वांनी चातुर्मासमध्ये सेवा, कार्य केले. कोरोनामुळे आम्हाला फार काही जास्त करता आले नाही, परंतु प.पु. युवाचार्य महेंद्रऋषी यांचे विचार तंत्रज्ञानाचा उपयोग करून घराघरात पोहोचविता आले ही चांगली बाब दिसून आली. असे दलिचंदजी जैन म्हणाले.

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषी महाराज साहेब लिखित ‘मुनी गुणमंगलमाला’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी दीपकजी ओस्तवाल यांचे सहकार्य लाभले. मानपत्र वाचन नितीन चोपडा यांनी केले. अपूर्वा राका यांनी सूत्रसंचालन केले. हा समारोह पार पडल्यावर सर्व संतांनी पळसखेडा-सोयगाव औरंगाबाद जिल्ह्याकडे विहार केला. या कार्यक्रमाचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले होते.

 

Protected Content