पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. घराच्या जिन्यावरून उतरत असताना पाय घसरल्याने रत्नाबाई अनिल पाटील (वय ४९) या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बांबरुड गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाबाई पाटील या शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या जिन्यावरून उतरत होत्या. त्यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तात्काळ रत्नाबाई यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले.
रत्नाबाई पाटील यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपासासाठी ही नोंद शून्य क्रमांकाने भडगाव पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. रत्नाबाई पाटील यांच्या आकस्मिक निधनाने बांबरुड बुद्रुक गावातील नागरिक हळहळले आहेत.