मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यावरून भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. यावरून निर्माण झालेल्या वादावर कबर विरोधकांना आत्ताच कशी दिसली? तुमचे पाच वर्ष राज्य होते, तेव्हाच टाकायची ना उखडून, असे म्हणत खा. संजय राऊत यांनी भाजपवर कडक शब्दात टीका केली आहे.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसींचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद परिसरातील औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्यामुळे राज्यात दोन दिवसांपासून कबरीचा मुद्दा तापू लागला आहे. यासंदर्भात ओवेसींवर टीका होत असताना, हनुमान चालीसा वाचण्यावर राणा दाम्पत्याकडून राजद्रोह झाला, तर मग आता ओवेसींने काय केले, त्यावर राजद्रोह का दाखल केला जात नाही? त्यावरून राज्य सरकारवर भाजपाकडून टीका केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचा भडीमार करीत, गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ, अशांत करण्यासह लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. औरंगजेबाची कबर विरोधकांना आत्ताच दिसली का? औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिल्यामुळे तुम्हाला ते बेकायदेशीर वाटते आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतली वास्तू आहे ती, टाका ना उखडून, तीचे काय करायचे ते आताही केंद्र करू शकते. शिवसेनेला कधीही हिंदुत्वासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली नाही. हिंदुत्वाच्या अग्निपरीक्षा कधीच पार केलेल्या असून शिवसेना हिंदुत्वावरच बोलत आलेली आहे. आम्ही मुळचे हिंदुत्ववादि आहोत, बाकीचे सगळे उपरे आणि तात्पुरते आहेत, असा टोला राऊत यांनी दिला आहे.