फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यातील शेतकर्यांची थकीत एसआरपीची रक्कम आणि कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएस यांच्यासाठी तब्बल १६ कोटी रूपयांची थकीत रक्कम देण्यात यावी असा महत्वाचा निकाल हायकोर्टाने दिला असून या प्रकरणी कारखान्याचे माजी संचालक नरेंद्र नारखेडे यांनी प्रसारमाध्यमांमा माहिती दिली.
मधुकर सहकारी साखर कारखाना काळाच्या पडद्याआड गेला असला तरी कारखाना सुरू असतांना बर्याच शेतकर्यांची ऊस पुरवठा केल्यानंतर एसआरपीनुसार मोठ्या रकमेचे घेणे बाकी होते. तर कर्मचार्यांचा पीपीएफ देखील बाकी होता. यातच कारखाना बंद होण्याआधी २०१८/१९ या हंगामातील सारखर विकून आलेल्या पैशांमधून देणी चुकवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात याआधी जिल्हा बँक आणि कर्मचारी व शेतकर्यांमध्ये अनेकदा बोलणी झाली असली तरी तोडगा निघाला नव्हता. या पार्श्वभूमिवर, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शरद महाजन, माजी संचालक नरेंद्र नारखेडे आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात धाव घेतली होती.
या प्रकरणी पूर्ण सुनावणी झाल्यानंतर सोमवारी निकाल देण्यात आला. यानुसार, न्या. आर. व्ही. घुगे आणि वाय. व्ही. खोब्रागडे यांच्या खंडपिठाने निकाल दिला. यात त्यांनी कारखान्याकडे असलेल्या अमानत रकमेपैकी कामगारांच्या पीएफसाठी १ कोटी ३७ लक्ष रूपये तर जेडीसीसीचे उर्वरित कर्ज चुकवण्यासाठी १ कोटी ३ लक्ष रूपये देण्याचे निर्देश दिले. तर उर्वरित रक्कम ही थकबाकी असणार्या शेतकर्यांना देण्यात यावी असा कोर्टाने निकालात स्पष्ट केले आहे.