चाळीसगाव प्रतिनिधी । अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना त्वरीत शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही आज आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, यंदा अवकाळी पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने खूप मोठे अस्मानी संकट उभे राहीले आहे. ज्वारी, बाजरी, मका अश्या पिकांना कोंब फुटले असून मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून पाणी साचल्याने कपाशीचे पीकही सडत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट बळीराजापुढे उभे ठाकले आहे. झालेला खर्च सुद्धा निघणार नाही इतक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या भयावह स्थितीत आज आमदार मंगेश चव्हाण यांनी खडकी बुद्रुक शिवारातील नुकसानाची पाहणी केली. त्यांनी उपस्थित अधिकारी यांना तात्काळ शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या तसेच मदत देण्याकरिता जी काही प्रशासकीय प्रक्रिया असते ती जलदगतीने राबविण्याच्या सूचना दिल्यात.
यानंतर शेतकर्यांशी बोलतांना आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, नुकसानीबाबत कालच नामदार गिरिषभाऊ महाजन व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. पिक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ विमा क्लेमबाबत जिल्हाधिकार्यांना विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांनीदेखील संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लवकरच होणार्या अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकर्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खंडू जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पं.स. सभापती दिनेश बोरसे, कृ.उ.बा. सदस्या अलकनंदा भवर, भाजपा तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, मंडळ अधिकारी डी. आर. मोरे, कृषि विभागाचे मंडळ अधिकारी जे. व्ही. पाटील, कृषी सहाय्यक सुजाता सरदार, खडकी येथील महादु पागे, रतन कोल्हे, कौतिक मांडोळे ,
संजय मांडोळे, शरद पाटील, अशोक पाटील, नाना तांबे, बापु डोखे, पुंडलिक जगताप, रामभाऊ मांडोळे, वाल्मिक धनगर, दत्तु डोखे, शिवाजी मांडोळे, हिलाल वाघमोडे, मुरलीधर तांबोळे आदी उपस्थित होते.