अहमदाबाद वृत्तसंस्था । ‘विराटला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीने चांगली कामगिरी केली. त्याचे नेतृत्व चांगले आहे. कारण त्याच्याकडे रोहित शर्मा तर याशिवाय धोनीसारखा मार्गदर्शक लाभला. विराटच्या या यशामागील सर्व रहस्य माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने उलगडून सांगितले आहे.
अधिक माहिती अशी की, अहमदाबादमधील विद्यापीठातील एका कार्यक्रमाप्रसंगी माध्यमांशी बोलताना गौतम गंभीरने सांगितले की, महेंद्रसिंग धोनी हा जगातील महान कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं दोनदा (टी-२० आणि वनडे) विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. तर रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सर्वाधिक चार वेळा जेतेपद मिळालं आहे. कर्णधार म्हणून विराटला मिळत असलेल्या यशाचे श्रेय गंभीरने या दोघांना दिले आहे. संघात प्रतिभावान खेळाडू नसतात तेव्हा कर्णधाराचा खरोखर कस लागतो. कोणत्याही फ्रॅन्चायजी संघाचं नेतृत्व करत आहात आणि तुम्हाला मदत करणारे खेळाडू संघात नसतील तर तेव्हा खऱ्या अर्थानं नेतृत्वाची कसोटी लागते. विराट कोहलीची कर्णधार म्हणून आयपीएलमधील कामगिरी तुम्ही पाहू शकता, याकडेही गंभीरने लक्ष वेधले.