वरणगाव येथील ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेला स्थगिती

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथील रोहिणी जावळे यांच्यासह अन्य नगरसेवकांच्या अपात्रतेला नगरविकास मंत्रालयाने स्थगिती दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, वरणगाव येथील नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी येथे गटनेते पदावरून दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या अनुषंगाने नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केलेल्या अर्जावरून काही दिवसांपूर्वीच रोहिणी सुधाकर जावळे यांच्यासह अरूणबाई शामा इंगळे, जागृती सुनील बढे, विकीन नारायण भंगाळे व नितीन निवृत्ती माळी यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविले होते.

या निर्णयाच्या विरोधात रोहिणी सुधाकर जावळे यांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितली होती. यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला अपात्र ठरविण्यात आले असून याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यामुळे वरणगाव नगरपालिकेतील खडसे गटाला दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या नगरसेवकांतर्फे जळगाव येथील अ‍ॅड. अतुल सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

Protected Content