वादळात चिंचेचे झाड कोसळल्याने दोन सख्ख्या बहिणांचा जागीच मृत्यू

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अश्या मयत झालेल्या दोन्ही बहिणींचे नावे आहेत.

वडील बल्लू बारेला हे तालुक्यातील रणाई येथील रहिवाशी आहेत. शेतात सालदारकी करत असल्यामुळे बल्लू हे अंचलवाडी गावातील खळवाडीत चिंचेच्या झाडाखाली वास्तव्याला होते. आज दुपारी वादळाच्या तडाखा सुरू झाल्याने  अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.  याचवेळी काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात बल्लू बारेला यांच्या दोन मुली  ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.  घटनेनंतर गावातील सरपंच भगवान पाटील, रंगराव पाटील, गोपाळ पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थ व तरुण मदतीला धावून आले. झाडाखाली संपूर्ण झोपडी दाबली गेल्याने झाड कापून मुलींचे मृतदेह व सामान बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Protected Content