




नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘देशात सध्या तुकडे-तुकडे गँगची सत्ता आहे, अशा शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राजकीय विरोधकांबरोबरच आता काही मान्यवरही खुलेपणानं आपलं मत मांडू लागले आहेत. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही याच अनुषंगाने केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘देशात सध्या तुकडे-तुकडे गँगची सत्ता आहे,’ असा जोरदार आरोप त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. आंदोलन व्यवस्थितरित्या न हाताळल्यानं सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळं संतापलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडंच काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग देशात अशांतता पसरवत आहे. त्यांना अद्दल घडवावी लागेल, असे शहा यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आलेल्या तुषार गांधी यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पहिले जात आहे.


