
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पाडळे बुद्रुक, पाडळे खुर्द, निरुळ, पिंप्री, खिरवड तसेच परिसरातील यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल (कल्पना हरिभाऊ) जावळे यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

पाहणीदरम्यान आमदार जावळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी, कापूस, मका तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पिके जमिनीवर आडवी पडली असून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी बोलताना आमदार जावळे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील वेदना, उध्वस्त झालेली पिके आणि वर्षभराच्या कष्टांचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून या कठीण प्रसंगी मी शेतकरी बांधवांसोबत खंबीरपणे उभा आहे.”
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यादरम्यान तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून प्राथमिक माहिती संकलित केली.
“शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या प्रत्येक अश्रूची जाणीव ठेवून नुकसानभरपाई व मदतीसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. या संकटाच्या काळात ते एकटे नाहीत, मी त्यांच्या सोबत आहे,” असे आश्वासन आमदार अमोल जावळे यांनी दिले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत असतानाच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने पुढाकार घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



