हातातून मोबाईल लांबविणारे तिघे जेरबंद; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  रविवार १९ डिसेंबर रोजी दुपारी अटक केली आहे. याप्रकरणी तिघांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 

दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या घटनांचा प्रकार वाढला आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक रवाना केले. यात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख बागुल, पोलीस नाईक बैसाने, विजय पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, पंकज शिंदे, दीपक शिंदे, हेमंत पाटील यांनी रविवारी १९ डिसेंबर रोजी संशयित आरोपी नितीन दत्तू पाटील रा. शिव कॉलनी, गोविंदा उत्तम गोपाळ व विकास लहू गोपाळ दोन्ही रा. साने गुरुजी कॉलनी रामानंदनगर परिसर जळगाव या तिघांना शहरातील साने गुरुजी कॉलनी परिसरातून पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नागरिकांकडून हिसकावले ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाईसाठी तिघांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान यातील संशयित आरोपी नितीन पाटील यांच्यावर यापुर्वी नाशिक आणि रामानंदनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हा दाखल आहेत.

Protected Content