अयोध्यानगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्यानगरातील महावितरणच्या क्वारंटाईन सेंटरमधून ६५ हजार १४५ रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तिघांकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संतोष उर्फ बाळू नामदेव सैंदाणे वय ४५ रा. सदगुरु नगर, जळगाव, दत्तू नामदेव चौधरी वय ३७ रा. जैनाबाद, जळगाव व सुरेश उर्फ सागर प्रमोद सोनवणे वय ३५ रा. खेडी इंदिरानगर, जळगाव अशी अटकेतील तिघा संशयितांची नावे आहेत. 

सविस्तर माहिती अशी की, अयोध्यानगरातील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात परिसरातील कार्यालये व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या इमारत क्रमांक ७ येथील खोली क्रमांक ३ व ४ या दोन्ही खोल्यांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. काही दिवसांनी बंद करण्यात आले होते. २७ जुलै ३ ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी या क्वारंटाईन सेंटरमधून ४ पलंग, ६ गाद्या, उशा, ६ पंखे असा एकूण ६५ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी १३ ऑगस्ट रोजी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील संशयिताबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी यांच्या पथकाने शनिवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास संतोष सैंदाणे, दत्तू चौधरी व सुरेश सोनवणे या तिघांना अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.   पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content