वाराणसी (वृत्तसंस्था) एकीकडे वाराणसी शहरातील ३० टक्के घरांमध्ये नळाने प्यायचे पाणी येत नाहीय आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील दोन दिवसीय दौऱ्याआधी वाराणसीमधील रस्ते धुवून काढण्यात आले. संतापजनक बाब म्हणजे या स्वच्छतेसाठी १ लाख ४० हजार लिटर पिण्याची नासाडी करण्यात आली आहे.
यासंदर्भात द टेलीग्राफने एक वृत्त दिले आहे. त्यानुसार वाराणसी महापालिकेने मोदी शहरात येण्याच्या आदल्या रात्री पाण्याचे ४० टॅक आणि ४०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यात आले. अशाप्रकारे केवळ सणासुदीच्या दिवशी वाराणसीतले रस्ते वर्षातून एक दोन वेळा धुतले जातात. एका सरकारी अधिकाऱ्याने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येण्याआधी शहरातील रस्ते धुवून काढण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते,’ अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. वाराणसी हे येथील मंदिरांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी स्थानिक प्रशासनाच्या अहवालानुसार शहरातील ७० टक्के घरांमध्येच नळाने पाणी येते. आजही वाराणसीमधील ३० टक्के घरांना पिण्याच्या पाण्यासाठी वहीरींमधील पाण्यावर अवलंबून रहावे लागते.