चोरट्यांचा धुमाकूळ! दादावाडी परिसरातून एकाच रात्रीत चार दुचाकी लंपास


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दादावाडी परिसरात सध्या दुचाकी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत चार दुचाकी चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण दादावाडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ३० नोव्हेंबर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दादावाडी परिसर लक्ष्य केला. या ठिकाणी राहणारे शैलेंद्र राजाराम आमोदकर यांची (एमएच १९ सीके ६९८१) क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी त्यांच्या निदर्शनास आले. ही एकच घटना नसून, त्याच रात्री चोरट्यांनी याच परिसरातील आणखी तीन दुचाकींवर हात साफ केल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी शैलेंद्र आमोदकर यांच्यासह परिसरातील अन्य तीन नागरिकांच्या दुचाकी लंपास केल्या. त्यात अभय पारसमल जैन यांची (एमएच २० एव्ही ०४७४), देविदास तुकाराम पाटील यांची (एमएच १८ एएम १९८५) आणि अशोक दिगंबर पाटील यांची (एमएच १९ बीडी ०२१०) क्रमांकाची दुचाकी यांचा समावेश आहे. एकाच रात्री, एकाच परिसरातून चार मौल्यवान वाहने चोरीला गेल्याने पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले आहे.

या चोरीच्या मालिकेबाबत शैलेंद्र आमोदकर यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील हे पुढील तपास करत आहेत.