शेत शिवारात वीज तारांची चोरी! उन्हाळ्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील शेती शिवारात विद्युत खांबांवरील वीज तारा चोरीला गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, उन्हाळ्याच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी भागातील शेतकरी आणि माजी पंचायत समिती सभापती विकास समाधान पाटील, दादाराव नामदेव पाटील, किशोर भागवत पाटील यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमच्या वीज तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या धक्कादायक प्रकारानंतर शेतकऱ्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पठार, पोलीस कॉन्स्टेबल पवन सपकाळ आणि सुकळीचे पोलीस पाटील संदीप इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, सहा ते सात विद्युत खांबांवरील सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या वीज तारा चोरीला गेल्या आहेत. काही ठिकाणी तारा तुटलेल्या अवस्थेत खाली पडलेल्या आढळल्या. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ही चोरी झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. केळीच्या पिकाला नियमितपणे पाण्याची आवश्यकता असते आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने नवीन तारा जोडणी होईपर्यंत पाणी देण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे सुकळी परिसरातील शेतकरी धास्तावले असून, त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पोलिसांनी या चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेणे हे आता मोठे आव्हान आहे.

Protected Content