
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सिंडींगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आलीय. दरम्यान, राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात पाऊस पाडला जाणार आहे.
राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्यामुळे पर्जन्यमानात वाढ होणे अत्याआवश्यक झाले आहे. त्यासाठी कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे. कृत्रिम पर्जन्यमानसाठी सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने आज मंत्रिमंडळाने एरियल क्लाऊड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. परदेशात एरियल क्लाऊड सिंडींगच्या प्रयोगातून 28 ते 43 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे.