मथुरा । अयोध्यानंतर मथुरामध्ये नवीन संघर्ष होण्याची शक्यता कमी झाली आहे. कारण, श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीबाबत दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार होती. परंतु, याचिकाकर्ते सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी तहकूब करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मथुरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात.
श्रीकृष्ण विराजमान, स्थान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इतरही अनेक लोकांनी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा केला आहे की, 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ (सध्याचं श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान) आणि शाही इदगाह मशीद यांच्यात जमिनीसंदर्भात करार झाला होता. यामध्ये निश्चित करण्यात आलं होतं की, जेवढ्या जागेत मशीद बांधण्यात आली आहे, तेवढ्याच जागेवर कायम राहिल. परंतु, 1968 मध्ये मथुरा न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात काही लोकांनी कृष्णाच्या जन्मस्थानी असलेली सतराव्या शतकातील इदगाह मशीद हटवण्यासाठी मथुरा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत मंदिराची 13 एकर जागा ही कटरा केशव देव मंदिराच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे.