जळगाव (प्रतिनिधी) भर पावसाळ्यातही शहरातल नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस वाट बघावी लागतेय. तर दुसरीकडे मात्र, गुजराल पेट्रोल पंपजवळ गेल्या ८ दिवसांपासून पाण्याची वाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत तक्रार करूनही पालिकेकडून अद्याप दुरुस्ती करण्यात येत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, गुजरात पेट्रोल पंप ते पिंप्राळा रस्त्यावर मागील ८ दिवसापासून पाईपलाईन फुटलेली आहे. याबाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार करून सुद्धा आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ही पाईपलाईन फुटल्याने इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. सततचे पाणी साचल्यामुळे एक मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. शासन एकीकडे ‘पाणी बचाव’चा संदेश देत असतांना लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.