कोरबा (छत्तीसगड):(वृत्तसंस्था) काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमुळे नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे. काँग्रेस पक्षाचे लोक नक्षलवाद्यांना क्रांतिकारक म्हणतात. त्यामुळेच नक्षलवादी हल्ले होत आहेत, असा आरोप पंतप्रधान मोदींनी आज येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत केला. मोदींनी प्रचारसभेतील भाषणात काँग्रेसवर अनेक आरोप केले.
विधानसभा निवडणुकांवेळी मी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे जनतेचं लक्ष वेधलं होतं, असं ते म्हणाले. नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेले भाजप नेते भीमा मांडवी यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झालेल्या परिसरात हा हल्ला झाला आहे, हे दुर्दैवी आहे. हे हल्ले का झाले ? असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसला जबाबदार धरले. छत्तीसगड राज्याला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट आखला जात आहे, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.