धरणगाव विकास मंचाची बैठक उत्साहात संपन्न

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आज रोजी शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या प्रास्ताविकात विकास मंच चा उद्देश फक्त शहराचा विकास साधणे असून राजकीय द्वेषापोटी व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने एकमताने शहराचा विकासासाठी प्रयत्न करावे असे राजू ओस्तवाल म्हणाले.

बैठकीदरम्यान स्वच्छ्ता, पाणी पुरवठा, आरोग्य, रस्ते, वीज, घाणीचे साम्राज्य, ग्रामीण रुग्णालय, खेळाचे मैदान, बस स्थानक व प्रवाशांच्या समस्या, कायदा व सुव्यवस्था, रहदारी ची समस्या, आजपावेतो पूर्ण न झालेली सर्व रखडलेली कामे, तालुकांतर्गत रस्ते दुरुस्ती, तरुण वर्गाला हाताला काम आदी प्रलंबित विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे हे प्रश्न जैसे थे आहेत. शहराचा विकास करण्यासाठी सर्व संबंधितांचा सहभाग, सहकार्य आणि समन्वय अपरिहार्य असल्याचे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

विकासात्मक उपक्रमांवर विशेष चर्चा करण्यात आली. धरणगाव शहराचा नावलौकिक कायमस्वरूपी राहावा, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन शहर व तालुक्याच्या विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, हा विचार चर्चेतून पुढे आला. या कारणास्तव शासनदरबारी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धरणगाव विकास मंच ची समिती गठित करण्यात आली असून, यामध्ये सर्वच स्तरातील बुद्धिजीवी सदस्य आहेत, असे सांगण्यात आले.

या बैठकीत डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रा.आकाश बिवाल, ॲड.व्ही एस भोलाणे, भगवान कुंभार, ॲड.सी झेड कट्यारे, विजयकुमार शुक्ला, सुधाकर मोरे, उदय भट, नदीम काझी, किशोर पवार, ललित मराठे, राहुल क्षत्रिय, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर आदींनी शहराच्या विविध समस्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले. बैठकी दरम्यान ललित मराठे, विजय सोनवणे, दिपक वाणी, रविंद्र महाजन, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल पवार, अरुण विसावे, गोरख देशमुख, भूषण भागवत, महेंद्र तायडे, मयूर भामरे, राजू महाजन, सागर पाटील, शैलेश भाटिया, राहुल पाटील, राहुल महाजन, कुणाल सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जैन यांनी तर आभार लक्ष्मणराव पाटील यांनी मानले. कल्याणकारी तसेच विकासाच्या अजेंडा राबविण्यासाठी शहरातील बुद्धिजीवी व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांनी एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी केले.

Protected Content