धक्कादायक : विवाहितेनं राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय; मात्र माहेरच्यांचा घातपातचा आरोप !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगरात राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शुक्रवारी २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून तिच्या पतीने मारहाण करून तिला गळफास दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. ममता रतिलाल राठोड वय ३० रा. साईनगर, मन्यारखेडा शिवार, ता. जळगाव असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगर येथे ममता राठोड या महिला आपल्या पती रतीलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मोलमजूरी करून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, गुरूवारी २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता राहत्या घरात विवाहिता ममता यांनी साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विवाहितेच्या माहेरच्यांनी धाव घेवून एकच आक्रोश केला होता. ही आत्महत्या नसून विवाहितेला तिचे पती रतिलाल राठोड यानेच पैशांसाठी दारून पिऊ मारहाण करून गळफास दिल्याचा आरोप विवाहितचा भाऊ मुकेश वसंत चव्हाण रा. आकाशवाणी चौक, जळगाव यांनी केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. मयत विवाहितेच्या पश्चात मुलगा प्रितेश (वय-९), मुलगी निधी (वय-७), आईवडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Protected Content