मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खारघर येथील कार्यक्रमातल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली असून दुपारी १२ ते ५ या वेळेत मैदानावर कोणताही कार्यक्रम घेण्यात येऊ नये असा जीआर शासनाने जारी केला आहे.
खारघरमधील महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १३ वर पोहचला आहे. या घटनेत अद्याप १० रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. भर उन्हात हा कार्यक्रम घेण्याचा अट्टहास केल्याबद्दल सरकारला विरोधी पक्षांसह सर्वसामान्यांनी आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. या पार्श्वभूमिवर आज राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला असून मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांना याची माहिती दिली.
महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खारघर दुर्घटनेवर भाष्य केलं. १२ ते ५ वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ते म्हणाले की, खारघर येथे झालेली परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १२ ते ५ वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.