


श्रीगोंदा– श्रीगोंदा – बेलवंडी स्थानका दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
आज पहाटे सोलापूर रेल्वे विभागातील मनमाड- दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकानजिक दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वेचे १२ डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही यात जखमी झालेले नाही.
या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील रेल्वे स्थानकावरच रोखण्यात आल्या आहेत. सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला ४२डबे होते. त्यातील १२ डबे रुळावर घसरले आहेत. रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.


