हुकुमशहाला चार गाढवं एकत्र चरत असली तरी भिती वाटते ! : शिवसेना

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हुकुमशहा डरपोक असतो, चार गाढवं एकत्र चरत असली तरी भीती वाटते, असा टोला मारत बंदीमुळे संसद हे आता जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पाडणारे सभागृह राहिलेलं नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखातून संसदेत अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या शब्दकोशाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणार्‍या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे. आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही.

यात पुढे म्हटले आहे की, सरकारने ‘असंसदीय’ शब्दांची नवी यादी जाहीर केली आहे. जयचंद, शकुनी, जुमलाजीवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशाह, विनाश पुरुष, कालाबाजारी असे मजबूत शब्दभांडार संसदेत उधळण्यावर त्यामुळे निर्बंध येणार आहेत. सत्ताधारी बाकांवरील सदस्य हे गेल्या काही वर्षांपासून शिस्तीचे अजीर्ण झाल्याप्रमाणेच वागत आहेत. पण विरोधी बाकांवरील सदस्यांनीही या अमोघ शब्दशस्त्रांचा वापर करू नये यासाठी हा सगळा डाव रचण्यात आला आहे. हुकुमशहा डरपोक असतो, चार गाढवं एकत्र चरत असली तरी भीती वाटते, असा टोला मारत बंदीमुळे संसद हे आता जनतेच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पाडणारे सभागृह राहिलेलं नसल्याची टीका यात करण्यात आलेली आहे.

Protected Content