दोन टप्प्यात होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

नवी दिल्ली । दोन टप्प्यात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यात हे अधिवेशन होणार असल्याची माहिती असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा घेण्याची शिफारस केली आहे तर 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान भाग टप्पा घ्यावा अशी शिफारस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या पाच राज्यांसह अन्य राज्यांना काय मिळणार? याकडे लक्ष लागून आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं हे अधिवेशन दोन टप्प्यात होनार आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजी घेत हे अधिवेशन घ्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर वाढत्या कोरोनाचे सावट आहे. त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन्ही भवनातील 400 हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची आकडेवारी चार दिवसांपूर्वी समोर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दुसरीकडे दिल्लीत देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता आहे.

 

Protected Content