बसमधील जवानांवर दहशतवादी हल्ला : दोन जवान शहीद

श्रीनगर वृत्तसंस्था | श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या ९व्या बटालियनवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवान बसमधून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पंथा चौक-खोनमोह रस्त्यावर भारतीय राखीव पोलिसांच्या नवव्या बटालियनच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले, तर १२ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

बस थांबवण्यासाठी दहशतवाद्यांनी आधी बसच्या टायरवर गोळीबार केला, त्यानंतर बसवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. हा गोळीबार इतका भीषण होता की, जवानांना स्वतःचा बचाव करण्याचा वेळही मिळाला नाही. या हल्ल्यावेळी बसमध्ये एएसआई गुलाम हसन, कॉन्स्टेबल सज्जाद अहमद, कॉन्स्टेबल रमीज अहमद, कॉन्स्टेबल बिशम्भर दास, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल संजय कुमार, सेलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल विकास शर्मा, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद, कॉन्स्टेबल मुदस्सिर अहमद, कॉन्स्टेबल रविकांत, कॉन्स्टेबल शौकत अली, कॉन्स्टेबल अरशीद मोहम्मद, कॉन्स्टेबल शफीक अली, कॉन्स्टेबल सतवीर शर्मा, कॉन्स्टेबल आदिल अली, हे जवान होते. दरम्यान, यातील कोण शहीद झाले व कोण जखमी आहेत याची माहिती अद्याप मिळाली नाही.

दरम्यान, या हल्ल्यानंतर सुरक्षा बलांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

Protected Content