जळगाव प्रतिनिधी | बोरी नदीवरील तामसवाडी मध्यम प्रकल्प हा पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असून यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने बोरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, बोरी मध्यम प्रकल्प , तामसवाडी, ता. पारोळा जि. जळगाव या धरणाची सध्याची पाणी पातळी २६७.०५ मी. इतकी असून एकुण जीवंत साठा ९८.३०% इतका झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात ९८.३०% इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून धरणाचे सुरक्षिततेच्यादृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल. यामुळे बोरी धरणाचे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. जीवित वा वित्तहानी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.