खडसेंनी बदनामी केली : कारवाई करण्याची रिपाइंची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात काल झालेल्या घटनेत सत्याचा विपर्यास करून आमदार एकनाथराव खडसे यांनी बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाइंच्या आठवले गटातर्फे करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव शहरात दिनांक १६ मार्च रोजी महापुरूषांचा पुतळा काढून टाकल्याने मोठा वाद निर्मीत झाला होता. याच प्रकरणाच्या संदर्भात आज रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव शहरात १६ मार्च रोजी दीक्षित वाडीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांचा पुतळा स्थलांतरीत करण्याबाबत झालेल्या छोट्या वादाला मुख्यमंत्रीपदाचे स्वयंघोषीत उमेदवार म्हणवून घेणारे आमदार एकनाथराव खडसे यांनी स्वत:च्या राजकीय लाभासाठी वापरून घेतले. त्यांनी सभागृहात याबाबत बदनामी केली. खर तर, त्याच ठिकाणी सामाजिक संघटनांसह समाजबांधवांच्या उपस्थितीत पुन्हा पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. कुठेही यामुळे वाद झाला नसतांना खडसेंनी बदनामी केली.

या घटनेमुळे कुठेही गालबोट लागलेले नसतांना एकनाथराव खडसे यांनी राज्यभरात या प्रकरणी बदनामी केली असून या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. या निवेदनावर रिपाइं आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, किरण अडकमोल आदींसह इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत. हे निवेदन पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना देण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी उपस्थित होते.

Protected Content