Home Cities अमळनेर अमळनेरात 14 मे रोजी ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य

अमळनेरात 14 मे रोजी ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात १४ मे रोजी भव्य ऐतिहासिक महानाट्य ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ सादर होणार असून या निमित्ताने इतिहास, संस्कृती आणि प्रेरणेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे २५० कलाकारांच्या सहभागातून संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गाथा रंगमंचावर जिवंत होणार असल्याने या महानाट्याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

या उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देताना जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले की, सामाजिक जाणिवेतून आणि विविध क्षेत्रांतील उणिवा भरून काढण्यासाठी जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून संस्थेच्या कार्याचा प्रारंभ छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीदिनी या ऐतिहासिक महानाट्याने होत आहे. युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील यांनी या उपक्रमाला सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप असल्याचे नमूद केले.

संस्कृती फाऊंडेशनचे नाट्य कलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले की, सात्विक ठकार लिखित आणि राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाट्यात उत्तर महाराष्ट्रातील कलाकारांचा मोठा सहभाग आहे. यापूर्वी नंदुरबार आणि धुळे येथे या महानाट्याचे तीन यशस्वी प्रयोग पार पडले असून अमळनेरात चौथा आणि पाचवा प्रयोग होणार आहे. या महानाट्याची खासियत म्हणजे इतिहासाचा ‘लाईव्ह’ अनुभव प्रेक्षकांसमोर उभा राहणार आहे. चित्रपट कृत्रिम माध्यम असले तरी महानाट्य ही जिवंत इतिहासाची अनुभूती असल्याचे त्यांनी सांगितले.

या महानाट्यासाठी गेल्या १५ ते २० दिवसांपासून स्थानिक कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून अमळनेरसह परिसरातील शंभरहून अधिक कलाकार या प्रयोगात सहभागी आहेत. ज्यांना व्यासपीठ मिळत नाही अशा प्रतिभावान कलाकारांना संधी देणे हा संस्कृती फाऊंडेशनचा उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या माध्यमातून स्थानिक कलावंतांना नवे व्यासपीठ मिळणार असून सांस्कृतिक क्षेत्रात नवा आयाम निर्माण होणार आहे.

या महानाट्याच्या निमित्ताने जळगाव आणि अमळनेर येथे ‘संस्कृती कला विद्यालय’ स्थापन करण्याचाही संकल्प जाहीर करण्यात आला. या विद्यालयात स्थानिक कलाकारांना अभिनय, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक महानाट्य न राहता सांस्कृतिक आणि कौशल्य विकासाच्या चळवळीचे रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे.

गौतम पाटील यांनी जयनिल फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देताना गरजू विद्यार्थ्यांना मदत, रोजगार मेळावे, व्यक्तिमत्त्व विकास, युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रातील काम या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे आदर्श असल्याने खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोग राखीव ठेवण्यात आला असून या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांनी पासेस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विशेष म्हणजे या महानाट्याद्वारे इतिहासाची प्रेरणा आणि तरुणाईचा सहभाग यांचा अनोखा संगम घडवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. संभाजी महाराजांचे शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच सांस्कृतिक अभिमान जागवण्याचेही उद्दिष्ट या माध्यमातून साधले जाणार आहे.


Protected Content

Play sound