अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील अनोरे गावाने सत्य मेव जयते पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत सहभाग घेतला असून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांची ही तळमळ व एकजूट पाहून हे गाव वर्षभरासाठी श्री मंगळग्रह सेवा संस्थेने दत्तक घेतले असल्याची घोषणा अध्यक्ष डिगंबर महाले यांनी आनोरे येथे केली.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी आनोरे गावाला नुकतीच भेट देऊन झालेल्या कामाची पाहणी केली. केवळ ५०० लोकसंख्येचे हे गाव असून सर्व कुटुंब अत्यंत सामान्य परिस्थितीतील आहे. त्यांचे कामाचे स्वरूप पाहता हे गाव प्रथम पारितोषिक मिळविण्यास पात्र ठरेल असा विश्वास नक्कीच सर्वाना आहे. अमळनेर पत्रकार संघटनेच्या सर्व पत्रकार बांधवांनी गावाच्या उपक्रमांची माहीती जाणुन घेतली. यावेळी झालेल्या ग्रामसभेत माजी जि. प. सदस्य संदीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.पत्रकार तथा मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष राजू महाले यांनी संस्थांनतर्फे हे वर्षभरासाठी दत्तक घेण्याची घोषणा करत सुरवातीला ५०,००० हजार रू मदत जाहीर केली. सर्व पत्रकार बांधव तसेच मंगळग्रह सेवेकरी यांच्या सोबत लवकरच श्रमदानाला येऊ त्या दिवसाचा सर्व अन्नदानाचा संपुर्ण गावाचा व श्रमकरी याचा खर्च ही आम्हीच करू असे हे घोषीत केले. तर पत्रकार संजय पाटील यांनी ७२ वर्षाचे आजी-बाबा रोज श्रमदानाला येतात व इतरांना प्रेरणा देतात म्हणून त्यांना १०००/रू बक्षीस देऊन ग्रामसभेत सत्कार केला. पत्रकार बांधव आल्याने आम्हाला खुप बळ आल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.
ग्रामसभेत अधिक माहिती देताना संदीप पाटील म्हणाले की ५०० लोकसंखेचे हे गाव असून आर्डी व आनोरे ग्रुप ग्रामपंचयात आहे,या गावाची स्वतंत्र नोंद अजून कुठेही नसून महसूली गाव म्हणून पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत संधी मिळाली आहे,संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आता पर्यंत एकही गाव राज्यस्तरीय स्पर्धेत आले नाही यामुळे या बक्षिसाचा संकल्प करू या एकजूट गावाची निवड आम्ही केली आहे. प्रत्यक्षात ८ एप्रिल पासून स्पर्धा सुरू झाली आहे व विशेष म्हणजे टार्गेट प्रमाणे सर्व शोषखड्डे एकाच दिवशी या १०० टक्के पूर्ण करून इतिहास घडविला आहे, या गावात एकही शिवारात काडी कचरा जाळले जात नसून आगपेटी मुक्त शिवार आम्ही जाहीर केले आहे. सर्वत्र ८० टक्के ठिबक सिंचन प्रति कुटंब २ झाडे या गावाला टार्गेट असताना सुमारे ३०० झाडे पाच फुटाचे लावले आहेत व १४०० झाडांची रोपे तयार असून अजून २०० रोप अजून जमा केले आहेत,स्पर्धेत श्रमदानचे २५ व मशीन चे १५ व इतर इतर ४० मार्क आहेत,सुशिभिकर्ण अंतर्गत प्रत्येक घरास पांढरा रंग दिला असून सर्व घरांवर पाण्याचे व म्हणी लिहीणार आहेत. या गावात दररोज ग्रामसभा होते,शिस्तबध्द नियोजन असून प्रत्येकाचा वाढदिवस सामूहिक साजरा होतो,सर्व जयंती उत्सव देखील सामूहिक होतो,ख्वाजा नाईक यांच्या स्मृती दिन,आंबेडकर जयंती,महाविर जयंती समाज बांधवांना आमंत्रित केले. या गावाने आधी श्रमदान करून सामूहिक मतदान केले आहे.अजून श्रमदानाचे ४००० घ मि मिटर चे टार्गेट आहे,कंपरमेण्ट बल्डिंग बांध बंदिस्ती यास प्राधान्य दिले जात आहे. नुकतेच पाणी फाऊंडेशन चे तांत्रिक प्रशिक्षक येऊन गेले त्यांनी एकही चूक काढली नाही संपूर्ण काम तंत्रशुद्ध असल्याचे त्यांनी सांगत आनोरे पॅटर्न म्हणून सर्वत्र राबविण्याचे संकेत त्यांनी दिले.अजून ५ शेततळे,नाला खोलीकरण,कंपरमेट बल्डिंग असे ५०००० घ मि चे काम करायचे असून गावकरी श्रमदानासाठी दररोज शंभर टक्के सहभागी होत आहेत कोणत्याही परिस्थितीत हे गाव पाणीदार करण्याचा संकल्प असून इतर गावानी देखील आदर्श घ्यावा असे या गावचे गुण आहेत,विशेष म्हणजे साडेतीन लाख लोकवर्गणी एकाच दिवशी ग्रामस्थानी जमा केली असून पारोळा,चोपडा येथील पाणी फाऊंडेशन ची टीम तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या २८ गावांच्या टीमने भेट देऊन प्रशिक्षण व माहिती घेतली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून गावाचे एक एक पैलू उमलत आहेत असेही संदीप पाटील यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, किरण पाटील, जितेंद्र ठाकुर, मुन्ना शेख, जितेंद्र पाटील,भटेश्वर वाणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या गावाचे काम व जिद्द पाहता शहर व तालुक्यातील इतर ग्रुपने देखील या गावात जाऊन श्रमदानसह इतर योगदान दिल्यास निश्चितपणे मोठे पुण्यकर्म मिळेल असे आवाहन पत्रकार संघाने केले आहे.