निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा : प्रियंका गांधी

priyanka gandhi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘एक्झिट पोल आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा,’ असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भाजपच्याच नेतृत्वाखाली एनडीए सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी हे आवाहन केले आहे.

 

गेल्या रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी अफवा आणि एक्झिट पोलवरुन घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, असे प्रियंका गांधी यांनी एका ऑडिओमार्फत जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, अशा अफवा कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, म्हणून यासंबंधी सावधानता अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलवरून टीका केली आहे. लोकांची नाळ ओळखण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत. कारण वास्तवापासून एक्झिट पोल कोसो मैल दूर असतात, असे सांगतानाच आंध्रप्रदेशात टीडीपीचे आणि केंद्रात रालोआचे सरकार स्थापन होईल, असा दावा चंद्राबाबूंनी केला. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे ट्विट केले आहे.

Add Comment

Protected Content