देशमुखांप्रमाणेच परब यांचीही अवस्था होणार ! : सोमय्यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । अनिल परब हे अनिल देशमुख यांच्या मार्गावरून चालले असल्याचा इशारा आज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकापेक्षा एक आरोपांच्या फैरी झाडल्या.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज ईडीकडून छापा मारल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याप्रसंगी सोमय्या म्हणाले, अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरांना परब यांना पण त्याच वाटेवर जावं लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनार्‍यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनार्‍यावरील साडेचारशे झाडं कापली.आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचं बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचं आहे.

एका बाजुला उद्धव ठाकरे कागदावर १९ बंगलो उभे करतात, दुसर्‍या बाजुला मिलिंद नार्वेकर २५ कोटींचा बंगला बांधतात, तर तिसर्‍या बाजुला अनिल परब यांनी रिसॉर्ट तर बांधला पण रिसॉर्टच्या बाजुला अनिल परब यांचा बंगला देखील आहे आणि म्हणून या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगल्यांची उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांसाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी. अशी यावेळी सोमय्यांनी मागणी केली.

सोमय्या पुढे म्हणाले की, छगन भुजबळांना सर्वोच्च न्यायालयानेही तीन वर्षे तुरूंगात ठेवलं होतं. अनिल देशमुख यांचा लवकरच भुजबळ होणार आहे. त्यांनी देखील कोट्यावधी रुपये, मग ते वाझे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकात्याच्या कंपनीत वळवला. ज्यांनी काळ्याचं पांढरं केलं, त्याच सीए व बोगस कंपन्यांनी मान्य केलं की कॅश देऊन चेक देत होते. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे. असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

Protected Content