जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभेत आमची युती आहे. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल. त्याचे काम दुसऱ्याला करावे लागेल, हे आमचं ठरलंय. फक्त आता मिडियाने आमच्यात भांडण लाऊ नये, असा मिश्कील उत्तर आज माजी मंत्री तथा शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी दिले. ते मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवात पत्रकारांशी बोलत होते.
या संदर्भात अधिक असे की, मराठी प्रतिष्ठानतर्फे गत तीन वर्षांपासून भजी महोत्सव आयोजित केला जात आहे. यातील पहिल्याच महोत्सवात नाथाभाऊ आणि सुरेशदादा या कट्टर राजकीय विरोधकांनी एकमेकांना भजी भरवल्याने राजकीय वर्तुळात धमाल उडाली होती. आज मेहरूण तलावावरील कार्यक्रमात ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी एकमेकांना भजी भरवून युती मजबूत असल्याचा संदेश दिला. तर भाजपचे विद्यमान आमदार राजूमामा भोळे व सुरेशदादा जैन यांनी देखील एकमेकाला केक भरवला. या पार्श्वभूमिवर,आगामी विधानसभेपर्यंत हा गोडवा टिकेल का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर श्री. जैन यांनी आमची युती आहे. त्यामुळे कुणाला तरी एकालाच उमेदवारी मिळेल. आणि आमच्यात ठरले आहे की, ज्याला उमेदवारी मिळेल. त्याचे काम दुसऱ्याला करावे लागेल. त्यामुळे आमच्यातील गोडवा विधानसभेपर्यंत टिकेल. फक्त मिडीयाने आमच्या भांडण लाऊ नये, असे मिश्कील उत्तर दिले. यावर एकच हास्य निर्माण झाले. याप्रसंगी माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी प्रतिष्ठानचे विजय वाणी आणि जमील देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.