मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी. तर काँग्रेसने राष्ट्रवादीला ही जागा दिल्यास जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी,असा नवीन प्रस्ताव समोर आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याकडे आहे. तर रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे खासदार आहेत. रावेरची जागा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीकडे मागितली आहे. त्या बदल्यात सिंधुदुर्ग- रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सोडली जाऊ शकते. निलेश राणे 2009 मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले होते, पण 2014च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य असलेले नारायण राणे यांचे निलेश हे पुत्र आहेत. त्यामुळे निलेश यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर नारायण राणे काय भूमिका घेतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.