शिवसेनेचा खांदा वापरून इटालियन माफियांचा गोळीबार – पात्रा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । महाराष्ट्रात इटालियन माफियांनी शिवसेनेच्या खांद्यावरून गोळीबार केल्याची शेलक्या शब्दांमधील टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र सरकारसह काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींवर हल्ला चढवला. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जुन्या प्रकरणात ज्याप्रकारे अटक करण्यात आली आहे, ते पाहता इटालियन माफिया सैरभैर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुसोलिनीचा उजवा हात असलेल्या पित्याची मुलगी देशात माफियाराज आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. देशात २०१४ पूर्वी इटालियन घराण्यातील व्यक्तीचेच सरकार होते आणि आतादेखील आई-मुलाचे इटालियन सरकार प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करीत आहे. 

विशेष म्हणजे या माफियांनी केवळ प्रसारमाध्यमेच नव्हे, तर मनासारखा निकाल दिला नाही म्हणून देशाच्या सरन्यायाधिशांवर टिका करून त्यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याचीही तयारी केली होती, असा टोला संबित पात्रा यांनी लगाविला. पात्रा पुढे म्हणाले, सोनियासेनेने अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे समित ठक्कर या सर्वसामान्य नागरिकालाही त्रास दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दररोज हिटलर म्हणणारे काँग्रेसचे नेते लोकशाहीचे खरे मारेकरी आहेत. 

माफियांची काही वैशिष्ट्ये असतात, त्यांना लोकशाहीची हत्या करायला आवडते, त्यांना भ्रष्टाचार आवडतो, त्यांना ड्रग्जचा व्यापार आवडतो आणि तरीदेखील लोकशाहीवादी असल्याचा ते दावा करीत असतात. अगदी त्याचप्रमाणे सोनिया गांधी देशात लोकशाही धोक्यात असल्याचे लेख लिहीतात तर राहुल गांधी प्रेमाचे राजकारण करण्याचा दावा करीत असतात. त्यामुळे इटालियन माफियांचा खरा चेहरा आता समोर आल्याचेही पात्रा म्हणाले.

Protected Content