सरकार अस्थिर करण्याचं ‘राष्ट्रीय कार्य’ पडद्याआडून सुरू- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । देशासमोर असणारे महत्वाचे प्रश्‍न सोडवायचे सोडून राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे ‘राष्ट्रीय कार्य’ भाजप पडद्याआडून करत असल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामधील अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, देश करोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे. मध्य प्रदेशचा घास गिळला तेव्हाच सगळ्यांना खात्री होती की, पुढचा नंबर राजस्थानचा आहे. तेथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याच मार्गाने जातील असे पैजा लावून सांगितले गेले. ते खरे ठरताना दिसत आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पायलट यांचा दावा असा की, काँगेसचे सरकार आता अल्पमतात आले आहे. पायलट यांचे म्हणणे खरे असले तरी सरकारचे भविष्य हे विधानसभेत ठरेल. काँगेस आमदारांची जी बैठक विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलावली, त्यास पायलट यांना मानणार्‍या दहा-बारा आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे खरा आकडा हा विधानसभेत डोकी मोजल्यावरच कळेल. मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपवर जो घोडेबाजाराचा आरोप केला तो गंभीर आहे. एका एका आमदाराला पंचवीस कोटींची ऑफर दिली जात आहे व तसे व्यवहार सुरू आहेत, पण आता आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत त्या गेहलोत यांना पाठिंबा देणाऱया आमदारांवर. हे गूढ व रहस्यमय आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, लडाख सीमेवरील आपल्या २० सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्‍न सोडवायचे राहिले बाजूला, काँगेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरू आहे. वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल. भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान असल्याचा सल्ला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Protected Content