अजित पवारांचे बंड फसले…भ्रमाचा भोपळा फुटला !- शिवसेना

Ajit Pawar

मुंबई प्रतिनिधी । भाजपला बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दुध देण्यासारखे असल्याची मल्लीनाथी करत अजित पवारांचे बंड फसले असून त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याची जोरदार टीका आज शिवसेनेतर्फे सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज लाडू पचतील काय, बंड फसले या शीर्षकाखालील अग्रलेखातून अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, भाजपची सत्तेसाठी कोणत्याही थराला व तळाला जाण्याची तयारी आहे. पण काही झालं तरी त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. भाजपास आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे व टोणग्याचे दूध काढण्यासाठी ऑपरेशन कमळ योजना आखली आहे. हेच लोक एरवी सत्ता हे साध्य वगैरे नाही अशी प्रवचने झोडत नैतिकतेचा आव आणतात. मग आता तुमच्याकडे बहुमत आहे, ते पाहूनच राज्यपालांनी शपथ दिली आहे असे तुम्ही म्हणत आहात ना? तर मग ही ऑपरेशन कमळची भामटेगिरी कशासाठी? आम्ही त्यांच्या या भामटेगिरीस आणि टोणगेशाहीस मनापासून शुभेच्छा देत आहोत. आज राज्यात सर्वत्र भाजपची छीः-थू होत आहे. टोणग्याचे शेण भाजपच्या स्वच्छ, पारदर्शक वगैरे चेहर्‍यावर उडाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील अस्वस्थ झाले असावेत. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार हे पंचवीस-तीस आमदार घेऊन भाजपच्या गोठ्यात येतील या भ्रमात फडणवीस व त्यांचे मंडळ होते. अजित पवार यांचे कथित बंड वाळूवर गाढवाने मुतावे व थोडी फसफस व्हावी तसे फसले असल्याची टीका यात करण्यात आली आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी हा काळा दिवस वगैरे पाळण्याचे ढोंग आता भाजपवाल्यांनी करू नये. राष्ट्रपती भवन, राजभवनाचा इतका गैरवापर देशात त्या काळातही झाला नव्हता. महाराष्ट्र नीट जागा झाला नसताना भल्यासकाळीच फडणवीस व अजित पवार यांनी राजभवनात जाऊन शपथ घेतली. ते बहुधा आंघोळ न करताच पाहोचले असतील; पण राजभवनात सगळयांनी लोकशाहीच्या नावाने आंघोळ केली. सर्व संकेत धाब्यावर बसवून एखाद्या भामटया, परागंदा झालेल्या चोराप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या सोहळयास स्वतःचे पै-पाहुणे तर सोडाच, पण परंपरेप्रमाणे अधिकारीवर्गदेखील हजर नव्हता. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचे येणारे सरकार नैतिक की अनैतिक हा विषय सोडा, पण देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडयाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडयाखाली उतरत नव्हता व चेहर्‍यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. हे लाडू त्यांना पचतील काय, हा खरा प्रश्‍न आहे आणि त्याचे उत्तर नाही असे आहे. सत्य असे आहे की, अजित पवारांचे बंड फसले आहे व त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. अजित पवारांबरोबर बारा आमदार गेले. त्यातील नऊ आमदार परत आले. शरद पवार हेच नेते आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र त्यांनाच आम्ही मानतो. पंचवीस वर्षांच्या मैत्रीला न जागणारे लोक अजित पवारांचाही कडेलोट करतील. अजित पवारांनी भाजपच्या नादास लागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फसवले. भाजपने अजित पवारांना फसवले व सगळयांनी मिळून महाराष्ट्राला फसवले. या फसवणुकीसाठी राजभवनाचा गैरवापर झाला. हे पाप आहे. पण पाप-पुण्यापेक्षा सत्ता महत्त्वाची असे ज्यांना वाटते त्यांना शेवटची घरघर लागली असल्याचे भाकीत या अग्रलेखात करण्यात आले आहे.

Protected Content