शिवाजीनगर पुल धोकादायक; डांबरीकरणाचा लेअर टाकण्याची गरज

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजीनगर पुलाचे काही काम अपूर्ण असतानाही त्यावरुन वाहतूक सुरू झाली आहे. पुलावर डांबरीकरणाचा ‘लेअर’ टाकण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुलावरील जोडफटी उघड्या पडत आहेत. त्यावरुन वाहने गेल्यास ती वर-खाली होतात. त्यामुळे वाहनांना जोरदारा दणका बसतो आणि आवाज होतो. दुचाकी वाहनधारकांना दणका बसत आहे. पुलाचे काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत तो वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. पुलाचे काम संथगतीने करण्यात आले.

त्यामुळे नागरिकांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागला. पुलाचे काम लवकर होत नसल्यामुळे नागरिकांनी या पूलावरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे आजही या पुलाचे रंगकाम पूर्ण झालेले नाही. पुलाच्या तळाच्या रस्त्याला काम अपूर्ण आहे.

पुलावर डांबरीकरणाचा ‘लेअर’ टाकण्याची गरज होती, परंतु पूल सुरू झाल्यानंतर, त्यावर हा ‘लेअर’ टाकण्यात आला नाही. त्यामुळे आजच्या स्थितीत पुलाच्या जोडसांध्यांमध्ये असलेल्या फटी वाढत असून वाहनांचे वजन आणि वेगाने त्या फटी वर-खाली होत असतात. वाहन त्यावरून गेल्यावर धडाक…धडाक असा जोरदार आवाज होत असतो.

वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या ठिकाणी डांबरीकरणाचा ‘लेअर’ टाकण्याची गरज आहे. डांबरीकरणाचा ‘लेअर’ टाकल्यास जोडसांध्याच्या फटी जोडल्या जातील आणि वाहनधारकांचा त्रासही वाचणार आहे. अन्यथा फटी वाढल्यास वाहनधारकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजीनगरमध्ये नवीन बांधण्यात आलेला पूल शहरात असला, तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आला आहे. सरकारने त्यासाठी स्वतंत्र निधी दिला आहे. त्यामुळे पुलावर डांबरीकरणाचा ‘लेअर’ टाकण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

शिवाय पुलाच्या छत्रपती शिवाजीनगरकडील दक्षिणमुखी मंदिरासमोर तळाच्या भागाला सपाटीकरण करण्याची गरज आहे. विभागच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून ही कामे तत्काळ करण्याचे आदेश देण्याची गरज आहे. अन्यथा डांबरीकरणाच्या ‘लेअर’ अभावी जोडसांध्यामधील फटी अधिक वाढत जाण्याची शक्यता आहे.

पूलावर सांधेजोडफटी वाढत असल्याने त्यावर वाहन गेल्या जोरात आवाज होतो. रात्री शांतता असल्याने वाहनांची ये-जा झाल्यास जोरजोरात आवाज होत असल्याचे या पूलाजवळ राहणाऱ्या छत्रपती शिवाजी नगरातील नागरिकांनी सांगितले, त्यामुळे या पूलावर लवरात लवकर डांबरीकरणाचा लेअर टाकण्यात यावा अशी मागणीही या नागरिकांनी केली आहे.

Protected Content