मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेला सरकार चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा रास्त असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये मी भाजपाच्या सर्व अडचणी ऐकून घेणार नाही, असे मत व्यक्त करत ५०-५० सूत्रावर कायम राहण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. यावर उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. १९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही, असे पवार म्हणाले. दरम्यान, राज्यामध्ये युतीला २२० जागा मिळण्याची शक्यता युतीमधील नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. मात्र पवारांच्या प्रचारबळामुळे भाजपाला केवळ १०५ जागांवर विजय मिळवता आला. २०१४ साली भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळला आहे. त्यामुळेच सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे.