शिवसेना आणि भाजप आमदारांची सभागृहात हाणामारी

Vidhan Bhavan

 

नागपूर (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याच्या मुद्द्यावरून आज नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये हाणामारी झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

आज सभागृहात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे पहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतही गोंधळ घातला. तसेच विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपला शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.

Protected Content