मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सत्ता स्थापनेची बोलणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येणार नाहीत. त्यामुळे ‘सत्तेच्या वादावर राज्यातच तोडगा निघावा’, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. दरम्यान, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ ते १६ मंत्रिपदे देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेत्यांना तसा निरोपही पाठवला असल्याचे कळते.
‘राज्य नेतृत्वाच्या स्तरावर सेनेशी चर्चा करून वाद संपवावा’, असे शहा यांनी सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील हे सेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. नगरविकास, गृह आणि महसूल यांऐवजी सार्वजनिक बांधकाम, अर्थ, ऊर्जा, उत्पादनशुल्क आदींपैकी काही खाती भाजप सेनेला देण्यास तयार आहे. सेना नेतृत्वाने हा प्रस्ताव मान्य केला नसल्याचे कळते. मात्र, ८ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन करावी लागणार असल्याने दोन दिवसांत तोडगा निघेल, अशी भाजप नेतृत्वाला आशा आहे. दरम्यान, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ ते १६ मंत्रिपदे देण्याबाबत भाजपने कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही’, अशी माहिती शिवसेनेने दिली आहे.